सातारा जिल्ह्यात महावितरण कंपनीने शेतकर्यांकडून अन्यायकारक वीजबिल वसुली चालू केली आहे. ती तातडीने थांबवून हुकूमशाही पद्धतीने सुरू असलेली घरगुती तथा शेती पंपाची वीज तोडणी तातडीने थांबवावी, अन्यथा आक्रोश आंदोलन तसेच रास्ता आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यात महावितरण कंपनीने शेतकर्यांकडून अन्यायकारक वीजबिल वसुली चालू केली आहे. ती तातडीने थांबवून हुकूमशाही पद्धतीने सुरू असलेली घरगुती तथा शेती पंपाची वीज तोडणी तातडीने थांबवावी, अन्यथा आक्रोश आंदोलन तसेच रास्ता आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊन काळापासून शेतकर्यांच्या वीज बिलाबाबत स्वाभिमानी संघटनेने वारंवार वेळोवेळी विनंतीपूर्वक अर्ज करुनही कोणतीही दखल न घेता व उत्तर न देता हुकूमशाही पद्धतीने महावितरण कंपनी सातारा जिल्ह्यात अन्यायकारक वीजबिल वसुली करत केली आहे.
संघटनेने या अगोदरही व्यथा मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी यांची बाजू सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चर्चेचे व मीटिंगचे लेखी आश्वासन देऊन सुद्धा आजतागायत कोणतीही मीटिंग झालेली नाही.
राज्य शासनातील जबाबदार मंत्री महोदय यांनी प्रसार माध्यमातून वेळोवेळी लाईट बील माफ करण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे एवढा थकबाकीचा डोंगर झालेला आहे असे असताना अचानक लॉकडाऊन उठल्यानंतर जनतेकडे आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना अचानक जबरदस्तीने विद्युत कनेक्शन कट करण्याच्या धमक्या देत व वेळ प्रसंगी कट करून जबरदस्तीने बेकायदेशीर वसुली चालू केलेली आहे ती तातडीने थांबविण्यात यावी.
अन्यथा दि. 24 रोजी नागठाणे, ता. सातारा येथे सर्व बाधीत ग्राहकांना घेऊन महावितरण व शासना विरोधात हनुमान मंदिर येथून आक्रोश मोर्चा काढण्यात येईल व नागठाणे सासपडे रोड कमान येथे हा प्रश्न निकाली लागेपर्यंत रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे
निवेदनावर स्वाभिमानाचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुनराव साळुखे, रमेश पिसाळ, अॅड. विजय चव्हाण, महादेव डोंगरे, जनार्दन आवारे, हेमंत खरात, दत्तात्रय पाटील आदींच्या सह्या आहेत.