कोरोनामुळे पंढरपूरची माघी वारीही रद्द, 10 गावांत संचारबंदी
Published:Feb 21, 2021 06:07 AM | Updated:Feb 21, 2021 06:07 AM
News By : Muktagiri Web Team
पंढरपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आता आषाढवारीनंतर पंढरपूरची (Pandharpur Maghi Wari) माघीवारीही रद्द करण्यात आलं आहे. कोरोनामुळे पंढरपूर शहरासह 10 गावांमध्ये संचारबंदी देखील करण्यात आली आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. (Pandharpur Curfew for 23rd February,Maghi wari also cancelled) कोरोनामुळे आषाढी वारीनंतर आता माघी वारीही रद्द करण्यात आलीये. पंढरपूर शहरासह शेजारच्या दहा गावांमध्ये संचारबंदीचे आदेश देण्यात आलेत. 22 फेब्रुवारी मध्यरात्रीपासून 23 फेब्रुवारी मध्यरात्रीपर्यंत ही संचारबंदी असणार आहे.. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबादचे आदेश काढले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे पांडुरंगाची भेट लांबली आहे. माघ वारी रद्द झाल्यामुळे वारकरी संप्रदायातील नव्या वर्षातील पहिल्या यात्रेच्या मार्गातही कोरोनाचं सावटं आल्याचं दिसत आहे. डिसेंबरनंतर पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचा आकडा वाढत आहे. यामुळे राज्य सरकारने नवी नियमावलीही जाहीर केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टाळण्यासाठी पंढरपूर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना निर्बंध लागू करण्यात आलेत. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागलीय. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येतायत. गेल्या 24 तासांत नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे 335 नवे रुग्ण तर शहरात 215 रुग्ण आढळून आलेत. कोरोनामुळे जिल्ह्यात तिघांचा बळी गेलाय. नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन केलं जातं आहे.