साळशिरंबेतील युवकाचा दांडीया खेळताना वीजेच्या धक्क्याने मृत्यू
News By : कराड | संदीप चेणगे
दांडीया खेळण्यासाठी गेलेल्या युवकाचा नवरात्रोत्सव मंडळासमोरील विद्युत रोषणाईस उभारलेल्या लोखंडी खांबात उतरलेल्या वीजेच्या प्रवाहाचा धक्का बसुन दुर्देवी मुत्यू झाला. यश सुभाष देशमुख (वय १७, रा. साळशिरंबे, ता. कऱ्हाड) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. खोपोलीनजीकच्या वावोशी (ता.खालापूर, जि. रायगड) येथे रविवारी (ता. २) रात्री साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ऐन नवरात्रोत्सवात घडलेल्या या दुर्देवी प्रसंगाने साळशिरंबे गावावरही शोककळा पसरली आहे.
याबाबत माहिती अशी ः साळशिरंबे येथील सुभाष देशमुख कुटुंबासह खोपोलीनजीक वावोशीत वास्तव्यास आहेत. तेथील खासगी कंपनीत ते नोकरी करतात. त्यांचा मुलगा यश हा बीएच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत घराला हातभार लावण्यासाठी कंपनीत नोकरी करत होता. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वावोवशी येथे दुर्गाउत्सव मंडळासमोर दांडीया खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी मंडळाने विद्युत रोषणाईसाठी लावलेल्या लोखंडी खांबाला त्याचा हात लागला. त्याच खांबात वीजेचा प्रवाह उतरल्याने त्याला धक्का बसला. नवरात्रोत्सवामुळे त्याने पायात चप्पलही न घातल्याने त्याला वीजेचा धक्का मोठ्या प्रमाणात बसला. खांबाला एक हात ओढून घेतल्याने त्याने सोडवण्यासाठी दुसरा हात पुढे केला, मात्र दोन्ही हात वीजेच्या प्रवाहाने ओढून गेले. त्यानंतर काही वेळाने तो दूरवर फेकला गेला. त्यात त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. तातडीने त्याला रूग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. खालापूर पोलिसांत संबंधित घटनेची नोंद झाली असून चौक (ता. खालापूर) येथे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या मुळगावी साळशिरंबे येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुभष देशमुख व अर्चना देशमुख यांचा एकुलता एक मुलगा असलेल्या यशच्या जाण्याने कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, ऐन नवरात्रोत्सवात घडलेल्या या दुर्देवी प्रसंगाने साळशिरंबे गावावरही शोककळा पसरली आहे.