‘छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुभाव या तत्त्वांवर उभे होते आणि म्हणूनच जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी शिवइतिहास कोरला गेला,’ असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले.
सातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुभाव या तत्त्वांवर उभे होते आणि म्हणूनच जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी शिवइतिहास कोरला गेला,’ असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती समारंभात ते बोलत होते.
यावेळी महाविद्यालयाच्या कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सुनीता घार्गे व वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. तुळशीदास महानवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मेनकुदळे यांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा असलेला प्रभाव स्पष्ट केला. संस्थेच्या पहिल्या महाविद्यालयास कर्मवीर अण्णांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले. पहिल्या महाविद्यालयाची उभारणी होत असताना एका धनिकाने संस्थेला मोठी आर्थिक मदत देऊन स्वतःच्या वडिलांचे नाव महाविद्यालयाला देण्याविषयी प्रस्ताव ठेवला असता कर्मवीर अण्णांनी बाणेदारपणे उत्तर देत. एक वेळ मी माझ्या वडिलांचे नाव बदलीन, परंतु महाविद्यालयाला दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदलणार नाही, अशी गर्जना केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज रयत शिक्षण संस्थेचे आणि आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान असल्याचेही प्राचार्य डॉ. मेनकुदळे म्हणाले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.