गणेशवाडी (ता. खटाव) येथे फळबाग व ऊस शेतीस आग लागून लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे. याप्रकरणी वेगवेगळे दोन गुन्हे नोंद झाले आहेत.
वडूज : गणेशवाडी (ता. खटाव) येथे फळबाग व ऊस शेतीस आग लागून लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे. याप्रकरणी वेगवेगळे दोन गुन्हे नोंद झाले आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, चांगदेव रामचंद्र राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या वडिलार्जित मालकीच्या गट नं. 77/3 व 77/6 मधील फळबागेस आग लागली आहे. आगीत आंबा, चिक्कू तसेच सागवानाची झाडे जळून खाक झाली आहेत. यामध्ये तीन वर्षांपूर्वी लागवड केलेली 50 आंब्याची झाडे, 55 पेरुची झाडे, 4 चिक्कूची झाडे, सागवानाची 250 झाडे यांचा समावेश आहे. या आगीमुळे राऊत यांचे सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शेजारील रवींद्र आनंदराव राऊत यांनी त्यांच्या ऊसतोडीसाठी ऊस पेटवून दिल्याने ही आग लागली आहे.
याप्रकरणी रवींद्र राऊत यांना विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ करण्याबरोबर जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नोंद केले आहे. तर रवींद्र राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपल्या शेताशेजारील चांगदेव राऊत यांचे गवताला आग लागून त्यांच्या स्वत:च्या बागेसह आपल्या ऊस पिकाचेही नुकसान झाले आहे.