कोरोनाचे राजकारण करणाऱ्या पालकमंत्र्यांना जनता माफ करणार नाही
धैर्यशील कदम यांचा पत्रकार परिषदेत घणाघाती आरोप
Published:May 26, 2021 10:08 AM | Updated:May 26, 2021 10:08 AM
News By : Muktagiri Web Team
पुसेसावळी : महामारीने हवालदिल झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आम्ही समाजकारणाचा घेतलेला वसा सोडणार नाही. आम्ही पाठपुरावा केलेल्या कोरोना सेंटरचे धैर्यशील कदमांना श्रेय मिळेल या भितीने पुसेसावळीत कोविड सेंटरचे चोरीछुपे उद्घाटन करून कोरोना महामारीचे राजकारण करणाऱ्या मुजोर पालकमंत्र्यांना जनता माफ करणार नाही असा घणाघाती टोला वर्धन अँग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी लगावला. वर्धन अँग्रो कारखान्यावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कदम म्हणाले की कराड उत्तर मतदारसंघात आरोग्याच्या पुरेशा सोईसुविधा अभावामुळे जनतेची ससेहोलपट होत आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यासाठी पुसेसावळी, काशीळ, उंब्रज, मसूर आदी ठिकाणी कोरोना सेंटर सुरू करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी यांचेकडे पाठपुरावा देखील केला होता. जिल्हाधिकारी यांचे सुचनेनुसार पुसेसावळीत स्व. डी.पी कदम इंग्लिश मिडीयम स्कूल येथे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी तहसीलदार यांनी पाहणी करून सकारात्मकता दर्शविली होती. मात्र प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहणाऱ्या बालकबुध्दीच्या पालकमंत्र्यांना ही जागा पसंत पडली नाही त्यांनी नागझरी रोडवरील एका शाळेत कोविड सेंटरची जागा निवडली त्यालाही आमचा आक्षेप नाही कारण लोकांची सोय होणे आवश्यक आहे. परंतु काल नाकर्त्या पालकमंत्र्यांनी केवळ चार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घेऊन चोरीछुपे पुसेसावळी कोविड सेंटरचे उद्घाटन केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. आमचा शिवसेना पक्ष देखील सत्तेत सहभागी आहे. सुनिता कदम या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत. पालकमंत्र्यांनी केवळ आपल्याला श्रेय मिळावे यासाठी आम्हाला डावलण्याचे काम केले. मात्र इथली जनता सुज्ञ आहे कोणी काय केले हे लोकांना समजते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रीय महामार्गावर अपघात झालेल्या लोकांना तातडीने उपचार मिळावे यासाठी 2012 साली काशिळ येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले होते. याकरिता मी बाबांच्याकडे आग्रह धरला होता. रुग्णालयाची सुसज्ज इमारत उभी झाल्यावर गेल्या आठ महिन्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांना बरोबर घेऊन या इमारतीची पाहणी करून कोविड रुग्णाच्या सेवेसाठी हे रुग्णालय तातडीने सुरू करण्याची प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. कोथ्या व्रुत्तीच्या पालकमंत्र्यांनी जाणीव पूर्वक हे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याकडे दुर्लक्ष केले. कोरोना काळात लोकांच्या सोईसाठी रुग्णालय सुरू करावे ही जनतेची आग्रही मागणी लक्षात घेऊन मी प्राणांतिक उपोषणाचा इशारा दिला. त्यामुळे जाग आलेल्या पालकमंत्र्यांनी रुग्णालय सुरू झाले तर आपल्याला श्रेय मिळणार नाही यामुळे प्रशासनाला हाताशी घेऊन आम्हाला बाजूला ठेवून उद्घाटनाची हौस भागवून घेतली आहे. आमच्या मागणीनुसार काशिळ, पुसेसावळीत कोरोना सेंटर सुरू झाले आहे. मात्र मसूर उंब्रजला कोविड सेंटर सुरू झाले पाहिजे यासाठी मी आग्रही आहे. तहसीलदार प्रांत यांना भेटून निवेदन दिले आहे. मसूरला वर्धन अँग्रो कारखान्याच्या माध्यमातून कोविड सेंटर सुरू करण्यासाठी आम्ही सकारात्मक भूमिका घेतली असताना पालकमंत्री तेथेही पाय आडवा घालण्याचे काम करीत असल्याचा आरोप कदम यांनी केला.