खटाव तालुक्यात चालू सप्ताहात विविध शासकीय कार्यालयासह अनेक गावांत कोरोनाचा घट्ट विळखा पडत चालला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी तालुक्यातील 41 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना संसर्गजन्य आजारामुळे आठवडाभरात सुमारे 12 जणांचे बळी गेले आहेत.
वडूज : खटाव तालुक्यात चालू सप्ताहात विविध शासकीय कार्यालयासह अनेक गावांत कोरोनाचा घट्ट विळखा पडत चालला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी तालुक्यातील 41 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना संसर्गजन्य आजारामुळे आठवडाभरात सुमारे 12 जणांचे बळी गेले आहेत.
शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार, वडूज येथील 3, मायणी 2, चितळी 1, कातरखटाव 5, राजापूर 4, पाचवड 4, रेवली 1, औंध 7, खटाव 2, जाखणगाव 3, कटगुण 1, खातगुण 1, मोळ 1, वरुड 1, कलेढोण 2, हिंगणे 1, विखळे 1, डांभेवाडी 1, विसापूर 1, बुध 1 येथील रुग्णांचा समावेश आहे.
यामध्ये वडूज ग्रामीण रुग्णालयातील राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमातील एक महिला वैद्यकीय अधिकारी तसेच एका पारिचारिकेचा समावेश आहे. बाधित वैद्यकीय अधिकारी मायणी येथील मेडिकल कॉलेजवर कोरोना ड्युटीसाठी कार्यरत होत्या. वडूज येथील रुग्ण धान्य बाजार गल्ली, अलंकार चित्र मंदिरा नजीकची रहिवासी आहे. यामध्ये एका बँक कर्मचार्याचाही समावेश आहे.
पत्नीनंतर पतीचाही मृत्यू
मागील आठवड्यात सातारा येथे कोरोना उपचारादरम्यान वाकेश्वर रस्त्यावरील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्या महिलेच्या 70 वर्षीय पतीचे शनिवारी पहाटे निधन झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय विसापूर, बुध, पाचवड, नेर, मायणी 2, उंचीठाणे, निमसोड, वडूज येथील कोरोनाबाधित रुग्णांचे आठवडाभरात मृत्यू झाले आहेत.
वरुडकरांचे आरोग्य रामभरोसे..
रॅपिड टेस्टमध्ये वरुड येथील जाधव वस्तीवरील एका 60 वर्षीय महिलेचा तसेच माने वस्तीवरील एका युवकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजते. मात्र, या दोघांनी उपचाराकरिता रुग्णालयात जाण्यास नकार दिला आहे. त्यांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे प्रशासनासह नागरिक हतबल झाले आहेत. सरपंचाची मुदत संपल्याने लोक त्यांना दाद देत नाहीत. प्रशासकाची जबाबदारी घेतलेले विस्तार अधिकारी गावाकडे फिरकत नाहीत. पोलीस पाटील स्वत:च क्वारंटाईन असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे वरुडकरांचे आरोग्य रामभरोसे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. या मुद्द्यावरून एका वस्तीवर किरकोळ भांडणतंटा झाल्याची चर्चा आहे. तर एका वस्तीवरील शेजार्यांनी राहते घर सोडून वस्तीवर छावणी करून राहण्याचा पवित्रा घेतला आहे. या वृत्तास माजी सरपंच वैशाली माने यांनी दुजोरा दिला आहे.