मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासह मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करा, अशी मागणी ठोसेघर पठारस्थित सध्या रा. कांदिवली पूर्व (मुंबई) येथील मराठी क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाने विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सातारा : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासह मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करा, अशी मागणी ठोसेघर पठारस्थित सध्या रा. कांदिवली पूर्व (मुंबई) येथील मराठी क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाने विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणांतर्गत शासकीय नोकर भरती आणि शैक्षणिक प्रवेशाबाबत स्थगिती देण्यात आली असून, त्यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. या निर्णयाच्या विरोधात न्याय मागण्याकरिता ठिकठिकाणी मराठी समाज आंदोलन करत आहे. पोलीस भरतीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणांतर्गत असलेल्या राखीव जागांचा कोटा ठेवूनच राज्य सरकारतर्फे पोलीस भरती करण्यात यावी, अन्यथा स्थगिती मिटेपर्यंत पोलीस भरती थांबवण्यात यावी. इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला हक्काच्या जागा उपलब्ध करून द्याव्यात. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे एसइबीसी कोट्यात परीक्षेचे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे, तो अन्याय त्वरित दूर करावा. इतर शासकीय पदांची रखडलेली भरती आणि रखडलेले शैक्षणिक प्रवेश याबाबत राज्य सरकारने गंभीरपणे प्रयत्न करून सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची स्थगिती हटवावी किंवा अध्यादेश काढून लवकरात लवकर ही समस्या सोडवावी.
राज्य सरकारने मराठा समाजाला तात्पुरत्या स्वरूपात दिलेल्या इएसडब्ल्यू सवलतीपेक्षा मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे मराठा आरक्षण मिळवण्याकरिता केंद्र सरकारच्या काही मंत्र्यांना पत्रव्यवहार करावा. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती रद्द होईपर्यंत, मराठा समाजातील विद्यार्थी आणि युवकांसाठी अनेक निर्णय सध्याच्या सरकारने घेतले आहेत. उदा. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) निधी पुरवठा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेला लाभ एसइबीसी प्रवर्गातील उमेदवारांना देणे, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास निधी देणे, मराठा समाजातील तरुणावरील गुन्हे मागे घेणे, मराठा क्रांती मोर्चामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरीत घेणे या निर्णयाची ताबडतोब व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देताना राजाराम चव्हाण, संजय चव्हाण, सुधीर पवार, बाळा धनवडे, उमेश पोपळे, अंकुश हुबाळ, विष्णू चांदर, जाधव, मोहन देशमुख, गणपती चोरगे, श्रीशेष जाधव, धनराज चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.