समस्त खंडाळा तालुका वारकरी सांप्रदाय, बळीराजा फाऊंडेशन आणि सुवर्णगाथा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पाऊले चालती पंढरीची वाट' हा भक्तिमय कार्यक्रम लोणंद येथील श्री ज्ञानेश्वर माऊली पालखीतळ (बाजारतळ) येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमात समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या प्रभावी कीर्तनाने उपस्थित वारकरी व भाविक मंत्रमुग्ध झाले
लोणंद, दि.२९/ प्रतिनिधी
समस्त खंडाळा तालुका वारकरी सांप्रदाय, बळीराजा फाऊंडेशन आणि सुवर्णगाथा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पाऊले चालती पंढरीची वाट' हा भक्तिमय कार्यक्रम लोणंद येथील श्री ज्ञानेश्वर माऊली पालखीतळ (बाजारतळ) येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमात समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या प्रभावी कीर्तनाने उपस्थित वारकरी व भाविक मंत्रमुग्ध झाले.
कीर्तनात मार्गदर्शन करताना ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) म्हणाले, "ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला, तर चुकीच्या मित्रांच्या संगतीमुळे आयुष्य भरकटते. आईचे दूध, वडिलांचे संस्कार आणि शिक्षकांचे शिक्षण कधीच वाईट नसते; मात्र वाईट संगती माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते." यावेळी त्यांनी युवकांनी योग्य मित्रपरिवाराची निवड करून संस्कारमूल्ये जपावीत, असा संदेश दिला.
कार्यक्रमादरम्यान आयोजित भजन स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. तसेच वारकरी संप्रदायासाठी निस्वार्थ भावनेने सेवा करणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी डॉ. नितीन सावंत व उत्तमराव सावंत यांच्या वारकरी सेवेला विशेष दाद देत त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले. पालखी सोहळ्यात हजारो वारकऱ्यांना मोफत औषध किटचे वितरण, गरजू वारकरी व कुटुंबांना धान्य शिध्याचे वाटप तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून डॉ. नितीन सावंत व उत्तमराव सावंत यांनी वारकरी सेवेचा आदर्श निर्माण केला असल्याचे त्यांनी नमूद केले. "सेवा हीच खरी ईश्वरभक्ती" या वारकरी परंपरेतील विचाराला त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून मूर्त स्वरूप दिल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास माजी आमदार मदनदादा भोसले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नितीनबापू भरगुडे, आनंदराव शेळके पाटील, जिल्हा परिषद सदस्य ऋषिकेश धायगुडे, पंचायत समिती सदस्य अतुल पवार, नगरसेवक अनिरुद्ध गाढवे, सुभाष घाडगे, हर्षवर्धन शेळके, देविदास चव्हाण, बापूराव धायगुडे, बाळासाहेब साळुंखे, महादेव क्षीरसागर ,प्रदीप क्षीरसागर, स्वप्निल क्षीरसागर, अनिल कुदळे, नानासो धायगुडे , हेमंत पवार यांच्यासह वारकरी संप्रदायातील मान्यवर, विविध भजन मंडळांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने वारकरी व भाविक उपस्थित होते.