बिदाल प्रतिनिधी :
एकीकडे सरकार 'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत स्वच्छतेच्या मोठ्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे माण तालुक्यातील विरळी गावातील ज कापूसवाडी जिल्हा परिषद शाळेत मात्र विदारक चित्र पाहायला मिळत आहे. येथील शाळेच्या स्वच्छतागृहाची पूर्णपणे दुरवस्था झाली असून, भिंती कोसळण्याच्या स्थितीत आहेत. यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नेमकी परिस्थिती काय?
शाळेतील स्वच्छतागृहाची पाहणी केली असता, तिथे केवळ नावापुरतेच बांधकाम शिल्लक असल्याचे दिसते. स्वच्छतागृहाच्या भिंतींचे प्लास्टर उखडले असून विटा उघड्या पडल्या आहेत. काही ठिकाणी तर भिंती अर्धवट कोसळलेल्या अवस्थेत आहेत.सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असणारे दरवाजेच अस्तित्वात नाहीत, ज्यामुळे विद्यार्थिनींची मोठी कुचंबणा होत आहे.फरश्या उखडलेल्या असून परिसरात मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाण वाढले आहे.
'स्वच्छ भारत' केवळ भिंतीवरील चित्रापुरताच!
विशेष म्हणजे, याच पडक्या भिंतीवर 'स्वच्छ भारत मिशन'चा लोगो आणि घोषवाक्ये रंगवलेली आहेत. "स्वच्छता पाळा, रोगराई टाळा" असे संदेश भिंतीवर दिसत असले, तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र याच्या अगदी उलट आहे. हा विरोधाभास पाहून प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
स्वच्छतागृह वापरण्यायोग्य नसल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर जावे लागते किंवा शाळा सुटेपर्यंत नैसर्गिक विधी रोखून धरावे लागतात. याचा थेट परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असून, त्यांना पोटाचे विकार किंवा संसर्ग होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.