महाबळेश्वरवाडी येथे डंपरच्या धडकेत महावितरणचे पाच वीज खांब जमीनदोस्त;
शेतकरी संतप्त, आंदोलनाचा इशारा
News By : Muktagiri Web Team
बिदाल प्रतिनिधी :
माण तालुक्यातील महाबळेश्वरवाडी येथील वगरेवस्ती परिसरात माती वाहतूक करणाऱ्या डंपरच्या निष्काळजीपणामुळे महावितरण कंपनीचे सुमारे पाच वीज खांब कोसळल्याची गंभीर घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून शेतकरी, दूध उत्पादक आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या माती वाहतुकीदरम्यान डंपरचा धक्का वीज खांबांना लागल्याने सलग पाच खांब कोसळले. या घटनेमुळे महावितरण विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात असून, शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्याचे काम ठप्प झाले असून, खरीप हंगामात पाण्याअभावी पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्याने परिसरातील दूध व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. दूध शीतकरण, दैनंदिन शेतीची कामे तसेच इतर वीजेवर अवलंबून असलेली कामे ठप्प झाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
घटनेनंतर संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी महावितरण विभागाने तातडीने नवीन वीज खांब उभारून वीजपुरवठा सुरळीत करावा, तसेच नुकसानास जबाबदार असलेल्या संबंधित वाहतूक ठेकेदारावर कठोर कायदेशीर कारवाई करून महावितरणचे नुकसान त्याच्याकडून वसूल करावे, अशी जोरदार मागणी केली आहे.
दरम्यान, महावितरण विभागाकडून पंचनामा करून नुकसानाचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. मात्र, घटना घडूनही संबंधित ठेकेदाराविरुद्ध अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
"शेतकऱ्यांचा संयम संपत चालला आहे. तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करून जबाबदार ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. अन्यथा महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा इशारा ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी दिला आहे.
या संपूर्ण प्रकरणात महावितरण विभाग आणि प्रशासन कोणती भूमिका घेणार, तसेच संबंधित ठेकेदारावर कारवाई कधी होणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.


