: लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ घोषणा, आश्वासने आणि भाषणे नव्हेत; तर जनतेच्या वेदना स्वतःच्या समजून त्या शासनाच्या निर्णयात रूपांतरित करण्याची क्षमता होय. वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघासाठी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांनी पुन्हा एकदा हे आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.वाई खंडाळा महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघाला तब्बल ३५२ कोटी रुपयांच्या निधीतून ४३ किलोमीटर लांबीचा १० मीटर रुंदीचा सिमेंट काँक्रीट रस्ता मंजूर करण्यात आला आहे.
खंडाळा, दि. २४ (प्रतिनिधी) : लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ घोषणा, आश्वासने आणि भाषणे नव्हेत; तर जनतेच्या वेदना स्वतःच्या समजून त्या शासनाच्या निर्णयात रूपांतरित करण्याची क्षमता होय. वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघासाठी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांनी पुन्हा एकदा हे आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.वाई खंडाळा महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघाला तब्बल ३५२ कोटी रुपयांच्या निधीतून ४३ किलोमीटर लांबीचा १० मीटर रुंदीचा सिमेंट काँक्रीट रस्ता मंजूर करण्यात आला आहे.
कान्हवडी-खंडाळा-लोणंद असा हा ४३ किलोमीटरचा मार्ग म्हणजे या भागाची जीवनवाहिनीच. हजारो शेतकरी, विद्यार्थी, कामगार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक रोज या मार्गावरून प्रवास करतात. या मार्गासाठी निवडणुकां दरम्यान अनेकांनी आश्वासने दिली, अनेकांनी भूमिका मांडल्या; परंतु प्रश्न मात्र तसाच राहिला. जनतेच्या या वेदना नामदार मकरंद पाटील यांनी जवळून अनुभवल्या. मतदारसंघातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि विकासाचा प्रश्न म्हणून त्यांनी हा विषय शासनाच्या सर्वोच्च स्तरावर सातत्याने लावून धरला.प्रशासकीय अडथळे, निधीची उपलब्धता आणि विविध विभागांतील समन्वय या सर्व आव्हानांवर मात करत त्यांनी अखेर ४३ किलोमीटर लांबीच्या १० मीटर रुंदीच्या सिमेंट काँक्रीट हायवेसाठी ३५२ कोटी रुपयांची ऐतिहासिक मंजुरी मिळवून दिली. हा रस्ता केवळ डांबर आणि सिमेंटचा प्रकल्प नसून हजारो कुटुंबांच्या सुरक्षित भविष्याचा मार्ग ठरणार आहे. शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत वेगाने पोहोचेल, उद्योग-व्यवसायांना नवी गती मिळेल, विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल आणि ग्रामीण भागाच्या विकासाला नवे बळ मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपघातांचे प्रमाण कमी होऊन असंख्य कुटुंबांचे अश्रू थांबविण्यास या मार्गाची मदत होणार आहे.
खंडाळा आणि खंबाटकी घाट परिसराने अनेक भीषण अपघात अनुभवले आहेत. अपघातानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेकांनी आपले जिवाभावाचे नातेवाईक गमावले. ही वेदना नामदार मकरंद पाटील यांनी केवळ ऐकली नाही, तर ती अंतःकरणापासून अनुभवली. त्यामुळेच खंडाळा येथे उभारण्यात आलेल्या ट्रॉमा केअर सेंटरची इमारत पूर्णत्वास आली असली तरी ती अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज होणे आवश्यक असल्याची बाब त्यांनी शासनासमोर प्रभावीपणे मांडली.त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत ट्रॉमा केअर सेंटरच्या अंतर्गत कामांसाठी, आधुनिक वैद्यकीय उपकरणांसाठी आणि आवश्यक सुसज्जीकरणासाठी २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हे केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर महामार्गावरील अपघातग्रस्तांना सुवर्णकाळात उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. गंभीर जखमींचे प्राण वाचण्याचे प्रमाण वाढणार असून ग्रामीण भागातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा त्यांच्या दारात उपलब्ध होणार आहे.वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघाच्या विकासाच्या इतिहासात या दोन्ही मंजुरी मैलाचा दगड ठरणार आहेत. एकीकडे सुरक्षित आणि आधुनिक रस्त्याचे स्वप्न साकार होत आहे, तर दुसरीकडे जीव वाचविणाऱ्या आरोग्य सुविधांचे जाळे अधिक सक्षम होत आहे. विकास म्हणजे केवळ निधी मंजूर करणे नव्हे, तर जनतेच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणे असते. जनतेच्या सुख-दुःखाशी नाळ जोडून काम करणारे नेतृत्व कसे असते, याचे प्रत्यंतर नामदार मकरंद पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यातून दिल्याची भावना संपूर्ण मतदारसंघात व्यक्त होत आहे.