*सातारा जिल्ह्यातील 19 हजार शेतकऱ्यांना 142 कोटींची अधिकची कर्जमुक्ती;* *- जिल्हाधिकारी संतोष पाटील*
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून निधी जमा*
News By : Muktagiri Web Team
सातारा दि. 7 :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातील तब्बल 19 हजार 58 कर्ज खात्यांना मिळाला असून, एकूण 142 कोटी 7 लाख 39 हजार 284 रुपयांची रक्कम थेट संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.
या कर्जमुक्ती योजनेत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक योगदान दिले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 16 हजार 995 कर्ज खात्यांवर एकूण 122 कोटी 9 लाख 59 हजार 848 रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. यामुळे बँकेच्या सभासद शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून कृषी क्षेत्राला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळण्यास मदत होणार आहे.
सहकारी बँकांसोबतच जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकांच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांमधील 2 हजार 63 कर्ज खात्यांवर 19 कोटी 97 लाख 79 हजार 436 रुपये जमा करण्यात आले आहेत.
प्रसिध्द झालेल्या यादीतील सुमारे 6 हजार शेतकऱ्यांनी अदयापही त्यांची ई-केवायसी पूर्ण करुन आधार प्रमाणीकरण केलेले नाही. अशा सर्व शेतक-यांनी त्यांचा शेतकरी ओळख क्रमांक (अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी) तात्काळ काढून घ्यावा व आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करुन घ्यावे. म्हणजे सदर कर्जमुक्ती योजनेचा लाभ त्यांना तातडीने मिळणे सुलभ होईल.
मयत शेतक-यांच्या वारसांनी त्यांची वारस नोंद त्यांच्या महसूली दप्तरावर (७/१२ वर) करुन घेणेसाठी महसूल विभागाकडे वारसाच्या नावांसह अर्ज करणेत यावा, जेणेकरुन त्यांची वारस नोंद होऊन त्यांना शेतकरी ओळख क्रमांक (अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी) काढणे व आधार प्रमाणीकरण पूर्ण करुन योजनेचा लाभ घेणे शक्य होईल. याबाबत सर्व तहसिलदारांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देणेत आले आहेत. शेतक-यांनी सदर योजनेबाबत कोणतीही अडचण असल्यास, जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा व तालुका स्तरावरील तहसिलदार आणि तालुका सहाय्यक निबंधक यांचेकडे संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे.


