देऊर बसस्थानकात भरधाव ट्रक घुसला; दैव बलवत्तर,... उपहारगृहातील मुलगा बचावला! उपहारगृहाचा अक्षरशः चकनाचूर; पहाटेची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळलागतिरोधक, स्पीड कॅमेऱ्यांची ग्रामस्थांची मागणी.....
पहाटेची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला गतिरोधक, स्पीड कॅमेऱ्यांची ग्रामस्थांची मागणी.....
News By : Muktagiri Web Team
पिंपोडे बुद्रुक , दि. ३१
सातारा-लोणंद राज्यमार्गावर देऊर (ता. कोरेगाव) येथे सोमवारी भल्या पहाटे भरधाव वेगातील ट्रक थेट एस.टी. बसस्थानकात घुसल्याने भीषण अपघात झाला. ट्रकने बसस्थानकातील उपहारगृहाला जोरदार धडक दिल्याने उपहारगृहाचे अक्षरशः चकनाचूर झाले असून, बसस्थानकाच्या परिसराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेच्या वेळी उपहारगृहात असलेला आर्यन समीर मांढरे हा मुलगा प्रसंगावधान राखून वेळीच बाजूला झाल्याने सुदैवाने बालंबाल बचावला. पहाटेची वेळ असल्याने बसस्थानक परिसरात गर्दी नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १२ एलटी ४६२८ क्रमांकाचा ट्रक लोणंदकडून साताऱ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. देऊर गावाच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट एस.टी. बसस्थानकाच्या दिशेने घुसला. ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, बसस्थानकातील उपहारगृहाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेनंतर परिसरात मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्रसंगावधानामुळे आर्यनचा जीव वाचला
अपघात झाला त्यावेळी आर्यन मांढरे हा मुलगा उपहारगृहात होता. अचानक ट्रक आदळल्याचा मोठा आवाज झाल्याने त्याने प्रसंगावधान राखत तातडीने बाजूला होण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तो ट्रकच्या धडकेतून सुदैवाने बचावला. काही क्षणांचा विलंब झाला असता तर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता होती. त्यामुळे ‘दैव बलवत्तर’ म्हणत ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दिवसा अपघात झाला असता तर...?
देऊर हे शैक्षणिक तसेच धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. परिसरात विविध शाळा-महाविद्यालये असून, विद्यार्थ्यांची मोठी ये-जा असते. तसेच मुधाई देवी देवस्थानामुळे या परिसरात भाविकांचीही कायम वर्दळ असते. देऊर एस.टी. बसस्थानकावर सकाळपासून रात्रीपर्यंत विद्यार्थी, प्रवासी, व्यापारी आणि भाविकांची मोठी गर्दी असते.
मात्र, सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याने बसस्थानक परिसर तुलनेने निर्मनुष्य होता. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. हीच घटना सकाळच्या गर्दीच्या वेळी किंवा दिवसा घडली असती, तर अनेक निष्पाप नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सातारा-लोणंद मार्गावर वेगाचा प्रश्न ऐरणीवर
सातारा-लोणंद राज्यमार्गावर दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढत आहे. अनेक अवजड वाहने आणि अन्य वाहने या मार्गावरून भरधाव वेगाने धावत असल्याने गावांच्या हद्दीत अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. देऊर बसस्थानक हे थेट महामार्गालगत असल्याने येथे प्रवाशांसह विद्यार्थी व नागरिकांची मोठी वर्दळ असते.
या पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसरात गतिरोधक (स्पीड ब्रेकर), स्पीड कॅमेरे तसेच आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी होत आहे.
प्रशासनाने आता तरी गांभीर्याने दखल घ्यावी
देऊर बसस्थानक परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न या अपघातामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केवळ अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आताच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. बसस्थानक परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक पाहणी करून वेगमर्यादा, गतिरोधक, दिशादर्शक फलक आणि स्पीड कॅमेरे बसवावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.


