शेतकऱ्यांच्या हक्काचे व्यासपीठ तयार व्हावे या भावनेतून व शेतकऱ्यांच्या मागणीतून वर्धनची निर्मिती झाली आहॆ. चालू हंगामात २७०१ दर देण्याचे आपल्या सर्वांच्या साथीने व साक्षीने देण्याचे कबूल करीत आहेत, आजपर्यंत शेतकऱ्यांनी जो विश्वास दाखविला आहे तो जपण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - धैर्यशील कदम, चेअरमन, वर्धन कारखाना
खटाव तालुक्यातील त्रिमली घाटमाथा येथील वर्धन अग्रो प्रोसेसिंग लि. कारखान्यात उसदराच्या चर्चेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व चेअरमन धैर्यशील कदम यांच्यात झालेल्या समन्वय बैठकीत २७०१ रुपये दर सर्वानुमते जाहीर करण्यात आला. कारखाना कार्यस्थळावर झालेल्या बैठकीत चेअरमन धैर्यशील कदम,संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, खटाव तालुका अध्यक्ष दत्तूकाका घार्गे, सूर्यभान जाधव, सचिन पवार, प्रमोद देवकर,वैभव पाटील, अजय पाटील, सत्यवान मोहिते, संतोष तुपे, पांडुरंग सूर्यवंशी, जालिंदर जाधव,बंडा पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना धैर्यशील कदम म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हक्काचे व्यासपीठ तयार व्हावे या भावनेतून व शेतकऱ्यांच्या मागणीतून वर्धनची निर्मिती झाली आहॆ. चालू हंगामात २७०१ दर देण्याचे आपल्या सर्वांच्या साथीने व साक्षीने देण्याचे कबूल करीत आहेत, आजपर्यंत शेतकऱ्यांनी जो विश्वास दाखविला आहे तो जपण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तालुकाध्यक्ष दत्तूकाका घार्गे म्हणाले की,चेअरमन धैर्यशील कदम यांनी दाखविलेली शिष्टाई व शेतकऱ्यांच्या प्रति त्यांना असलेली आपुलकी यातून समनव्याने हा तोडगा निघाला आहे,तालुक्यातील तीन कारखान्यापैकी दोन कारखान्यानी शेतकऱ्यांना आज जो विश्वास दिला आहॆ, शेतकरीही त्यांना सहकार्य करतील. दरम्यान धैर्यशील कदम यांचा दर जाहीर केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी स्वागत सूर्यभान जाधव यांनी प्रास्ताविक तालुकाध्यक्ष दत्तुकाका घार्गे यांनी केले तर आभार प्रमोद देवकर यांनी मानले.यावेळी खटाव तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.