पुणे मनपा,मराठी भाषा संवर्धन समिती,संवाद पुणे व यशदा आयोजित दुसरे राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन-२०२६ या संमेलनासाठी होणाऱ्या सर्वोत्कृष्ट साहित्यकृती ग्रंथ पुरस्कार यासाठी विद्यार्थी धर्म या पुस्तकाची निवड करण्यात आलेली आहे. या पुरस्काराचे वितरण दुसरे राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन-२०२६ बालगंधर्व रंगमंदिर,पुणे येथे दि.२१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
मुक्तागिरी वृत्तसेवा
नांदेड,दि.२०- येथील अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव लिखित अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या विद्यार्थी धर्म या पुस्तकाला उत्कृष्ट साहित्यकृती ग्रंथ नुकताच पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण शनिवार,दि.२१ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथे होणार आहे.
मूळचे सांगली जिल्ह्यातील रहिवासी असलेले सध्या अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत असलेले सुरज गुरव यांनी यापूर्वी नांदेड शहरांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सेवा बजावलेली आहे. सध्या सर्वार्थाने दुर्लक्षित असलेल्या प्राचीन संस्कृतीचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या नंदगिरी किल्ल्यांचे रक्षण व संवर्धन यांची मोहिम त्यांनी हाती घेतलेली आहे. या आगळ्या वेगळ्या उपक्रमास नांदेडकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.माझा जिल्हा माझा किल्ला ही खूणगाठ मनी बांधून नांदेड मधील तरुणाई आज सुरज गुरव यांच्या नेतृत्वाखाली नंदगिरीचे किल्लेदार म्हणून सदैव कार्यरत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र झटत असताना स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करत असताना वेळात वेळ काढून माझं गडप्रेम या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा अनुभव आणि तरुणाईला प्रेरणा देणारे प्रसंग यातून किल्ले संवर्धन या बाबतीत विचार त्यांनी शब्दबद्ध केले आहे. त्याची तिसरी आवृत्ती आगामी काळात येणारच आहे.
या उपरांत सुद्धा भरकटत चाललेल्या तरुणाईला स्वतःचे जीवन नंदनवन करून घेण्यासाठी जीवनात बदल करून घेण्यासाठी अनेक महत्त्वाच्या बारीक-सारीक गोष्टी याचबरोबर यशोशिखर गाठण्यासाठी जीवन मार्ग दाखविला.विद्यार्थी धर्म या पुस्तकासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ खर्च केला. व विद्यार्थी धर्म या पुस्तकाची त्यांनी डिसेंबर २०२५ मध्ये निर्मिती केली.या पुस्तकाला उदंड प्रतिसाद मिळाला.
सदरील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि ७ डिसेंबर २०२५ रोजी नांदेड येथे एका शानदार समारंभात पार पडला.अवघ्या एकच महिन्यात या पुस्तकाची कीर्ती राज्यभर पोहचली आहे.काही दिवसातच दुसरी आवृत्ती छापण्यात आली.