युवकांनी गैरसमज टाळून ‘अग्निपथ’ योजनेत सहभागी व्हावे : एस. ए. माशाळकर
News By : कराड | संदीप चेणगे
केंद्र सरकारने युवकांसाठी आणलेल्या ‘अग्निपथ’ योजनेबाबत समाजात अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. पण ही योजना देशातील वाढत्या बेरोजगारीवर तोडगा काढण्याचे महत्वाचे काम करणार असून, योजनेत सहभागी होणाऱ्या अग्निविरांना सेवानिवृत्ती पश्चात अनेक लाभ मिळणार आहेत. त्यामुळे युवकांनी गैरसमज टाळून ‘अग्निपथ’ योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर यांनी केले.
कृष्णा उद्योग समूहात कार्यरत असलेल्या माजी सैनिकांच्या बैठकीत ते बोलत होते. भारतीय नौदलात १७ वर्षे सेवा बजाविलेले श्री. माशाळकर म्हणाले, की ‘अग्निपथ’ ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. देशाच्या तिन्ही दलांचे प्रमुख मेजर जनरल बिपीन रावत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या योजनेवर तज्ज्ञांकडून अनेक वर्षे मेहनत घेतली गेली आहे. या योजनेत सहभागी होणारे सर्वच युवक ४ वर्षानंतर निवृत्त होणार नसून, काही लोकांना नियमित सेवेत पुढे कार्यरत राहता येणार आहे. शिवाय जे युवक निवृत्त होतील, त्यांना निवृत्तींनर अनेक स्वरुपाचे लाभ मिळणार आहेत. ज्याद्वारे ते स्वत:चा व्यवसाय किंवा अन्य स्वरुपाची नोकरीही करु शकतील. आज भारतातील नामवंत उद्योजकांनी अग्निविरांना निवृत्तीनंतर सेवेत सामावून घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. कृष्णा उद्योग समूहातही अग्निवीर म्हणून निवृत्त झालेल्या माजी सैनिकास सेवेत सामावून घेण्याबाबत चेअरमन डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुलबाबा भोसले सकारात्मक आहेत. ‘अग्निपथ’ योजनेबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी कृष्णा उद्योग समूहात कार्यरत असलेल्या माजी सैनिकांनी समाजात प्रबोधन करावे. याप्रसंगी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी व्ही. वाय. चव्हाण, जयवंत शुगर्सचे सुरक्षा अधिकारी जालिंदर यादव, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी संजय नलवडे यांच्याह माजी सैनिक उपस्थित होते.