छत्रपती शिवरायांचा इतिहास उजेडात आणण्याबरोबरच त्यांचा मानवी कल्याणाचा विचार महात्मा जोतिराव फुल्यांनी महाराष्ट्राच्या मातीत रुजवला. रायगडावरील छत्रपतींची समाधी शोधून जगातील पहिली जयंती त्यांनी साजरी केली. शिवरायांवरील पहिला पोवाडाही म. फुल्यांनी लिहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहिताना पत्राची सुरुवात जयशिवराय या शब्दाने करत असत. त्यामुळे छ. शिवराय समजून घ्यायचे असतील तर म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधी वाचले पाहिजेत,’ असे प्रतिपादन साहित्यिक अरुण जावळे यांनी केले.
सातारा : ‘छत्रपती शिवरायांचा इतिहास उजेडात आणण्याबरोबरच त्यांचा मानवी कल्याणाचा विचार महात्मा जोतिराव फुल्यांनी महाराष्ट्राच्या मातीत रुजवला. रायगडावरील छत्रपतींची समाधी शोधून जगातील पहिली जयंती त्यांनी साजरी केली. शिवरायांवरील पहिला पोवाडाही म. फुल्यांनी लिहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहिताना पत्राची सुरुवात जयशिवराय या शब्दाने करत असत. त्यामुळे छ. शिवराय समजून घ्यायचे असतील तर म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधी वाचले पाहिजेत,’ असे प्रतिपादन साहित्यिक अरुण जावळे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या मागासवर्गीय कामगार युनियनच्या वतीने महावितरणच्या मुख्य कार्यालय परिसरात छ. शिवरायांची 391वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, तहसीलदार आशा होळकर, जिल्हा वनक्षेत्रपाल शीतल राठोड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, ‘वंचित’चे चंद्रकात खंडाईत यांची प्रमुख उपस्थिती होती.
अरुण जावळे म्हणाले ‘महापुरुषांच्या इतिहासाचे विपर्यास करणार्या शक्ती सातत्याने पुढे येत आहेत. हिंदू-मुस्लीम दंगाफसाद घडविण्याचे डावपेच आखले जात आहेत. अशावेळी वैचारिक चळवळीत काम करणार्या बुद्धिजीवींनी खरा इतिहास समोर मांडण्याचा कसोशीने प्रयत्न करायला हवा. कारण, महापुरुषांचा इतिहास जर चुकीच्या पद्धतीने नव्या पिढीमध्ये रुजला, तर सामाजिक सौहार्द धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही.’
यादरम्यान अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांनी छ. शिवाजीराजे कसे मानवतावादी होते आणि ते कसे महान व्यक्तिमत्त्व होते, यासंबंधी विवेचन केले. यावेळी चंद्रकांत खंडाईत यांचेही मानोगत झाले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास तहसीलदार आशा होळकर, तर संत रोहिदास यांच्या प्रतिमेस दादासाहेब ओव्हाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमास राजीव काकडे, राजेंद्र खरात, दीपक जावळे, स्मिता खरात, स्वप्नील जंगम, विजय बडेकर, पोपट काटवटे, आकाश कुळसंगे तसेच महावितरणमधील अधिकारी, कर्मचारी व चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी स्वागत केले. संतोष भोसले यांनी सूत्रसंचालन केले. संपत कांबळे यांनी आभार मानले.