सह्याद्री कारखाना निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल
गुरुवारी होणार अर्जांची छाननी
News By : कराड I संदीप चेणगे

कराड : यशवंतनगर ता. कराड येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 157 अर्ज पत्र दाखल झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर 234 उमेदवारांचे एकूण 251 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यावेळी कारखाना निवडणुकीसाठी विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
गट /मतदार संघ निहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे-
- गट क्रमांक 1 - कराड मधून एकूण 14 उमेदवारांचे 18 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
- गट क्रमांक 2- तळबीड 32 उमेदवारांचे 34 नामनिर्देशन पत्र दाखल,
- गट क्रमांक 3- उंब्रज 30 उमेदवारांचे 31 नामनिर्देशन पत्र दाखल,
- गट क्रमांक 4- कोपर्डे हवेली 46 उमेदवारांचे 49 नामनिर्देशन पत्र दाखल,
- गट क्रमांक 5- मसूर 40 उमेदवारांचे 42 नामनिर्देशन पत्र दाखल.
- गट क्रमांक 6- वाठार किरोली 28 उमेदवारांचे 33 नामनिर्देशन पत्र दाखल.
- अ. जा. /अ. ज. राखीव - 9 उमेदवारांचे 9 नामनिर्देशन पत्र दाखल.
- महिला राखीव - 14 उमेदवारांचे 14 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
- इ.मा.व. राखीव मधून 11 उमेदवारांचे 11 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
- वि. जा. /भ.ज./वि.मा.वर्ग राखीव मधून 10 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत.
त्यामुळे पाच दिवसांत 234 उमेदवारांचे 251 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. दि. 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजले पासून निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयात दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. सदर छाननी गट निहाय करण्यात येणार असून प्रथम गट क्रमांक 1 ची छाननी करण्यात येईल व त्यानंतर गट क्रमांक 2, 3,4, 5 व 6 या क्रमाने छाननी होईल. गटातील नामनिर्देशन पत्रांची छाननी संपल्या नंतर महिला राखीव, अज/अजा, इमाव व विजा/भज/ वि.मा.व या राखीव मतदार संघातील दाखल नामनिर्देशन पत्रांची एका मागून एक छाननी करण्यात येईल.
या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निबंधक संजयकुमार सुद्रिक, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक राहूल देशमुख, संजय जाधव, उपनिबंधक अपर्णा यादव काम पहात आहेत.