विरोधकांकडून शेतकर्यांच्या अन्नात माती कालवण्याचे पाप
News By : Satara

ज्यावेळी शक्य होतं त्यावेळी शेतकर्यांना जादा देण्याचा प्रयत्न केला. त्यातून एसएमपी आणि नंतर एफआरपीपेक्षा 400 कोटी रुपये शेतकर्यांना त्यांच्या हक्काचे दिले. ते पैसे स्वत:च्या मांडीखाली दाबले नाहीत. माझी ती तसली प्रवृत्ती नाही आणि परंपराही नाही. आता अडचणी असल्या तरी त्या दूर करण्यासाठी जे जे करता येणं शक्य आहे ते ते करतो आहे. या अडचणींचे निर्मिक असणारे स्वत:चे आडवे जाण्याचे पाप झाकण्यासाठी भ्रष्टाचाराचा आरोप करत आहेत, असा घणाघात मदनदादा भोसले यांनी केला.
सातारा : ज्यावेळी शक्य होतं त्यावेळी शेतकर्यांना जादा देण्याचा प्रयत्न केला. त्यातून एसएमपी आणि नंतर एफआरपीपेक्षा 400 कोटी रुपये शेतकर्यांना त्यांच्या हक्काचे दिले. ते पैसे स्वत:च्या मांडीखाली दाबले नाहीत. माझी ती तसली प्रवृत्ती नाही आणि परंपराही नाही. आता अडचणी असल्या तरी त्या दूर करण्यासाठी जे जे करता येणं शक्य आहे ते ते करतो आहे. रात्रंदिवस त्यासाठी धावपळ सुरु आहे. निवडणूक डोक्यात घेवून बसलो नाही. या अडचणींचे निर्मिक असणारे स्वत:चे आडवे जाण्याचे पाप झाकण्यासाठी भ्रष्टाचाराचा आरोप करत आहेत. असं जर असेल आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या संपत्तीची अदलाबदली करा, असे आव्हान मदन भोसले यांनी मर्ढे, ता. सातारा येथे बोलताना दिले.
शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचारासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मानसिंगराव शिंगटे, मर्ढेचे सरपंच शरद शिंगटे, सोसायटीचे चेअरमन सुधाकर शिंगटे उमेदवार रतनसिंह शिंदे, दिलीप शिंदे, पै. जयवंत पवार उपस्थित होते.
पुढे बोलताना मदन भोसले म्हणाले, शेतकर्यांच्या हितासाठीच प्रकल्प उभारले. ते करताना काही अपेक्षित गोष्टी घडल्या नाहीत. त्याचा ताण आला. त्यातून सावरण्यासाठी जिद्द पणाला लावली. त्यासाठी पवार साहेबांचीही अनेकदा भेट घेतली. विरोधकांसारखं स्वत:ला काही मागायला गेलो नव्हतो. कारखान्याचे मालक असलेल्या शेतकर्यांसाठी कसलाही इगो न दाखवता जेथे जेथे जावं लागेल तिथे तिथे गेलो. राज्य सहकारी बँक 125 कोटी रुपये देण्यासाठी तयारही होती. प्रत्येक कारखाना दरवर्षी पैसे उभे करुनच चालवला जातो. आज उद्या करता करता अचानक एक दिवस बँकेने पैसे देण्यास नकार दिला. हा नकार आपल्या विरोधकांच्या आडवे जाण्यामुळेच मिळाला हे सत्य आहे. त्यानंतर इतर ठिकाणी प्रयत्न केले तर तिथे प्रत्येक ठिकाणी आडवे जाणारे हेच. आता केंद्र सरकारच्या सहकार विभागाकडून मदत मिळण्याचा मार्ग असताना तिथूनही मदत मिळणार नाही असे हेच सांगत आहेत. एक गोष्टच यांची कळत नाही. केंद्र सरकारने, राज्य सरकारने शेतकर्यांच्या कारखान्याला मदत करावी अशी भावना हे का ठेवत नाहीत? शेतकर्यांच्या अन्नात माती कालवण्यापेक्षा ही संस्था शेतकर्यांच्या मालकीची आहे ती सुरळीत रहावी असे यांना का वाटत नाही? संचालक मंडळ कोण यापेक्षा कारखान्याचे मालक हे शेतकरी आहेत हे यांच्या लक्षात का येत नाही? यापूर्वी स्व. तात्या चेअरमन होते तेव्हा आम्ही संघर्ष करत होतो. पण तेव्हा आम्हीच काय पण आमच्यापैकी कुणीही इतर कोणत्या कारखान्याला ऊस घातल्याचे एक उदाहरण दाखवा. कारखाना हा कोणाच्या खासगी मालकीचा नाही तो शेतकर्यांच्या मालकीचा आहे आणि त्यामुळेच अन्य दुसर्या कारखान्याला ऊस घालणार नाही ही भूमिका आम्ही तेव्हाही जपली. अशा व्यापक भूमिकेचा लवलेशही ज्यांच्या मनी नाही त्यांनी शेतकर्यांचा कळवळा आणणे हास्यास्पद आहे. कारखान्यासमोर अडचणी आहेत आणि त्या दूर करण्याची जबाबदारीही माझीच आहे. त्या जबाबदारीपासून पळ काढला नाही. धाडसाने त्याला सामोरा जात आहे. जिद्दीने पाय रोवून उभा आहे. या प्रसंगातून बाहेर पडून शेतकरी, कामगारांना त्यांच्या हक्काचं दिल्याशिवाय राहणार तर नाहीच शिवाय शेतकर्यांची कारखान्यावरील मालकी टिकवण्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.
रतनसिंह शिंदे म्हणाले, दोन टर्मपूर्वी मी संचालक झालो त्यावेळी मला वाटलं होतं की आपल्याला इथं संघर्ष करावा लागणार. मदन भोसले आणि आमचे राजकीय पक्ष त्यावेळी वेगळे होते. मी स्व. मदनराव आप्पांचा कार्यकर्ता. पण कारखान्यात मदन भोसले यांनी पारदर्शकपणे काम करताना मी आप्पांचा कार्यकर्ता म्हणून मला एकदाही गैर वागणूक दिली नाही. मदनरावआप्पांप्रती त्यांनी कधी द्वेष बाळगल्याचे मी पाहिले नाही. उलट आप्पा मंत्री झाल्यानंतर आप्पांचा वाईत जावून सत्कार केला. आप्पांना एका कार्यक्रमासाठी कारखान्यावरही बोलावले. आप्पाही येतो म्हटले. पण विरोधकांनी असा थयथयाट केला की आप्पांना येवूच दिले नाही. राजकारण राजकारणाच्या जागी होत असतं. पण 24 तास डोक्यात राजकारण ठेवून वावररणारे असे आपले विरोधक जगाच्या पाठीवर कुठे नसतील. त्यांनी असाच थयथयाट आता किसन वीर कारखान्याच्या निवडणुकीत चालवला आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत शेतकर्यांचा पुळका नव्हता आणि आताच तो का आला? यामागचे षडयंत्र समजून घ्या. राजकारण विरहित सर्वपक्षिय पॅनेलच्या पाठिशी उभे रहा.
मानसिंगराव शिंगटे म्हणाले, मी स्वत: उमेदवारीसाठी इच्छूक होतो. कारखान्याचा विस्तार झाला हे दिसत असताना त्याकडे डोळेझाक करता येणार नाही. अडचणींचा मुकाबला करण्यासाठी आता आमदार महेश शिंदे मदनदादांसोबत आहेत. दादांच्या प्रयत्नांना आ. शिंदे यांच्यामुळे बळ मिळणार आहे. आ. महेश शिंदे यांच्या कामाची पद्धत आता कोरेगाव, सातारा तालुक्यातही माहितीची आहे. त्यांनी शब्द दिला म्हणजे दिला. तो कसा पाळला जातो हे सहा तालुक्यातील सभासद पाहतील. कारखाना शेतकर्यांच्या मालकीचा रहावा यासाठी सभासद मदनदादा व आमदार महेश शिंदे यांच्या पाठिशी राहतील. विरोधकांच्या पाठिशी जावून कारखान्याची मालकी घालवायची आहे काय? जखम झाली तर हळद लावयची असते. पण विरोधक मीठाचं पोतं घेवून फिरतायत.
यावेळी पै. जयवंत पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक माजी सरपंच अरविंद शिंगटे यांनी, स्वागत सोसायटीचे चेअरमन सुधाकर शिंगटे यांनी तर आभार रामगुरुजी शिंगटे यांनी मानले. यावेळी पै. मधुकर शिंदे, माजी सरपंच अरविंद शिंगटे, उपसरपंच आप्पासाहेब शिंगटे, पै. माणिक पवार, बाळासाहेब शिंगटे, धर्माजी शिंगटे, अर्जुन भोसले, सुरेश पवार, सुभाष शिंगटे, तुकाराम जाधव, शामराव शिंदे, जगन्नाथ शिंगटे, सयाजी निकम, शंकर शिंगटे, बापू शिंगटे, स्वप्निल शिंगटे शेतकरी सभासद मोठ्या संख्येेने आदी उपस्थित होते.